दिल्‍लीत शेतकर्‍यांचा मोर्चा

Foto

नवी दिल्‍ली- कर्जमाफी व दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी देशातील हजारो शेतकरी शुक्रवारी (ता.३०) दिल्‍लीत पोहोचले असून, रामलीला मैदानातून शेतकर्‍यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा संसदेवर धडकणार आहे. या मोर्चात काँग्रेसचे अध्यक्ष खा.राहुल गांधी व दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही सहभागी होण्याची शक्यता आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे.

 

संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन शेतकर्‍यांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घ्यावा आणि देशभरातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यासाठी कायदा मंजूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्‍लीत पोहोचले आहेत. गुरुवारी शेतकर्‍यांचा मोर्चा रामलीला मैदानात पोहोचला होता. हा मोर्चा रामलीला मैदानातच थांबवण्यासाठी दिल्‍ली पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, शेतकरी नेते संसदेवर मोर्चा नेण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि अखेर शेतकर्‍यांचा मोर्चा संसदेच्या दिशेने रवाना झाला.

 

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. यासंदर्भात कायदा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली. ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करणारा व्यक्‍तीच देशावर राज्य करणार. शेतकरी ज्याला पाठिंबा देतील त्याचीच सत्ता येईल. जो शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करणार त्याचे नुकसानच होईल. देशातील कानाकोपर्‍यातील शेतकरी या मोर्चात सामील झाले आहेत.